अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
संगमनेर दि.५ (प्रतिनिधी) फक्त घोषणा करून नाही तर कृती आणि योजनांची अंमलबजावणी करून राज्यातील महीलांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकार महीलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात एक महीला उद्योजिका निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विकासाची प्रक्रीया राबविणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील ढोले पाटील लॉन्स, तालुका कृषी विभाग, पंचायत समिती उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाभार्थी प्रमाणपत्र वितरण, पापड व फूड प्रोसेसिंग युनिट वाटप, महिला बचत गट कर्ज वाटप आणि खेळते भांडवलाचे अनुदान डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. नीलम अमोल खताळ होत्या. तसेच महायुतीचे पदाधिकारी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महिलांनी औक्षण करून डॉ. सुजय विखेंना राखी बांधली आणि कार्यक्रमातील सहभागाने उत्साह निर्माण केला. यावेळी महिला बचत गटांमध्ये प्रामुख्याने फूड प्रोसेसिंग युनिट, मसाला यंत्र, पापड यंत्र यांचे वाटप करण्यात आले.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून, त्या क्षमतेला दिशा देणे आपले कर्तव्य आहे. बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय करून यश मिळवतील उद्या हजारो महिला त्यातून आर्थिक सक्षमता प्राप्त करू शकतात.
ते पुढे म्हणाले, “समानतेची घोषणा अनेकदा ऐकू येते, पण घटनेने दिलेली समानता प्रत्यक्षात आणणे ही खरी जबाबदारी आहे. महिलांना वाटप होणारे साहित्य हे केवळ वस्तू नाही, तर त्यामागे त्यांचे भविष्य उज्वल आणि सुरक्षित करणारा दृष्टीकोन असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.
संगमनेर शहरात सध्या गांजा, मटका यांसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या महिला व कुटुंबांची चिंता व्यक्त करत, डॉ. विखे यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला अशा गोष्टींवर कठोर कारवाईचे आवाहन केले. ते म्हणाले, “जेव्हा मुलगी घराबाहेर पडताना असुरक्षित वाटते, तेव्हा समाज म्हणून आपल्याला अंतर्मुख होवून विचार करावा लागतो.
कार्यक्रमात त्यांनी सांगितले की महायुती सरकार हे महिला भगिनींच्या पाठिंब्यामुळेच आजचे महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विश्वव्यापी नेतृत्व आणि मार्गदर्शनाने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून यशस्वीपणे जनतेसाठी काम करीत आहे.
राजकारणाबाबत स्पष्ट भूमिका मांडताना, त्यांनी सांगितले की, कोणताही विकास एकट्याने होत नाही. मतदारसंघात केलेल्या कामावर जनतेचा विश्वास आहे, आणि तो विश्वास तसाच राहील यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहावे.कार्यक्रमाच्या अखेरीस, डॉ. विखेंनी १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राहाता येथे परम पूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांची शिव पुराण कथा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कथेसाठी गावनिहाय महिला गटांची नावनोंदणी सुरू करण्यात येणार असून पासद्वारे सहभागी होता येणार आहे.
पुढील पाच वर्षांत पुन्हा तुमच्यासमोर आम्ही मतदान मागण्यासाठी आलो, तर आज घेतलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप होणार नाही, अशीच माझी जबाबदारी राहील,अशा शब्दांत त्यांनी आपली कृतज्ञता आणि दृष्टीकोन स्पष्ट केला.