अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
राहूरी : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांनंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. भंडारदरा धरणातून गुरुवारी ८९९३ क्युसेकने तर निळवंडेतून ४ हजार ८४१ क्युसेकने विसर्ग केला जात होता. मुळा धरणातही दोन दिवस पाण्याची जोरदार आवक झाल्याने मुळा धरणाचा पाणीसाठा ९२.५३ टक्के झाला असून ९ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व भागांत जोरदार पाऊस सुरू असला तरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातही पाऊस कमीच होता. मात्र मंगळवारपासून या भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे गेल्या २४ तासांमध्ये घाटघर येथे ९०, रतनवाडी येथे १०३, पांजरे येथे ११९,भंडारदरा येथे ८०, निळवंडे येथे ५३. अकोले येथे २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९८ टक्के झाला असून भंडारदरा धरणात जोरदार पावसामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. बुधवारी भंडारदरा धरणातून २० हजार ७६३ क्युसेकने तर गुरुवारी ८९९३ क्युसेकने विसर्ग सुरू होता. भंडारदरा धरणातील पाणी निळवंडे धरणात येत असल्याने निळवंडे धरणातून विसर्ग सुरू आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगड परिसरात मंगळवारी व बुधवारी रात्री धुवांधार पाऊस कोसळला. त्यामुळे दोन दिवस धरणात पाण्याची जोरदार आवक झाली. लहित खुर्द येथील सरिता मापन केंद्रापासून यंदाच्या हंगामातील विक्रमी ३५ हजार १०९ क्युसेकने धरणात नवीन पाण्याची आवक झाली. धरणसाठा झपाट्याने वाढला. मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या हरिश्चंद्रगड, आंबित, कुमशेत, जानेवाडी, कोतूळ भागातील भंडारदरा धरणाचा पाणीसाठी ९८ टक्के आहे. धरण भरल्याचे तांत्रिकदृष्ट्या सांगितले जात आहे.पावसामुळे पाणी आले. गुरुवारी मुळा धरणाचा पाणीसाठा ९२.५३ टक्के झाला.