अहिल्यानगर :शहाजी दिघे
अहिल्यानगर :- आज सोमवार सांयकाळी पाच वाजता नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते बटन दाबून मुळा उजव्या कालव्यातून पाणी सोडले. यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, राहुरी उपअभियंता विलास पाटील, उपअभियंता संदीप पवार, उपअभियंता अक्षय कराळे यांसह मुळा पाटबंधारे विभागाचे सर्व शाखा अभियंता उपस्थितीत होते.
शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला वरदान ठरणारे हे आवर्तन सोडल्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांतून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या कडाख्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न नेवासा तालुक्यात मोठी गंभीर बाब बनलेली होती. शेतकऱ्यांची उभी पिके शेतातील बोअरवेल गुळण्यावर आल्यामुळे कोमेजून चालली होती. त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार लंघे यांच्याकडे केलेली होती.
शेतकऱ्यांच्या पिकांसाठी व जनावरांना पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता, तालुक्यातील अनके गावात शेतीतील पाणी आटल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यामुळे मुळा धरणातून आवर्तन सोडण्याची एकमुखी मागणी आणि सतत पाठपुरावा आमदार लंघे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे केला. त्यामुळे मंत्री विखे यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवर्तन सोडण्याबाबत सूचना केली व तसे लेखी पत्र संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहीती आमदार लंघे यांनी यावेळी बोलतांना दिली.
मुळा उजव्या कालव्यातून अखेर सोमवारी आवर्तन सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना जीवदान मिळणार असून तालुक्यातील नागरीकांच्या पाटाला आलेल्या पाण्यामुळे गुळण्यावर आलेले बोअरवेल सुरु होवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार असल्यामुळे या आवर्तनाचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.